मला लोकसभेचे तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये , यासाठी माझे पूर्ण प्रयत्न..असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी नकारघंटा वाजवली असली तरी भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर निवडणूक लढविण्यासाठी दबाव वाढविल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे मुनगंटीवारांचा नकार व पक्षाचा होकार असेच भाजपच्या वर्तुळात दिसत आहे. यावरून मुनगंटीवारांना तिकीट निश्चित झाले आहे असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे हंसराज अहिर यांच्या झालेल्या पराभवानंतर भाजपने यावेळी कोणत्याही परिस्थितीत ही जागा गमवायची नाही असा निर्धार केला आहे .यासाठी अनेक पर्यायांची चाचपणी भाजपने केली.मात्र शेवटी भाजपचा हुकमी एक्का असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे.
या मतदारसंघातील जातीय समीकरणाच्या पुढे जात विजयश्री खेचून आणण्याची क्षमता केवळ सुधीर मुनगंटीवार यांच्यात आहे. 1989 व 1991 मध्ये लोकसभेत पराभूत झालेल्या मुनगंटीवार यांनी भाजपाच्या पुढील विजयाचा मार्ग प्रशस्त केला हे देखील तितकेच खरे आहे.पुढे 1995 ते 2019 सलग 6 टर्म ते विधानसभेत आहे.
या काळात तीन वेळा कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळाले. त्यातील अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला जी गती दिली,राज्य पातळीवर अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले ते त्यांच्या विरोधकांना देखील मान्य आहे.अजातशत्रू राजकारणी म्हणून ते ख्यातिप्रात आहे. विकासप्रती असलेली त्यांची तळमळ,त्यांचा अफाट जनसंपर्क यामुळे त्यांनी भाजपचा जनाधार वाढविला आहे ही वस्तुस्थिती आहे. विरोधात असताना देखील त्यांची विकासकामांची गती तीच होती व सत्तारूढ पक्षात ती अधिक तीव्र झाली.सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे.हे गुणविशेष त्यांना जातीय समीकरणांच्या पुढे घेऊन जाऊ शकतात.