खबरकट्टा /चंद्रपूर :-
वडिलाची प्रेमकहाणी कायमस्वरूपी संपविण्यासाठी चक्क मुलांनी वडिलाच्या प्रेयसीची निर्घूण हत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवार, 8 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास शहरातील रमाबाई नगर परिसरातील झरपट नदीच्या किनार्याजवळ घडली. मना मनोज कोठार असे मृतक महिलेचे नाव आहे.याप्रकरणी रामनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी दिली.
अमरजीत चव्हाण व सुजीत चव्हाण असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी झरपट नदी परिसरात एक महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांच्या चमुने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रत्यक्षदर्शी त्या महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची बाब निदर्शनास आली. याप्रकरणाचा रमाबाई नगरात तपास केला असता, मागील काही वर्षापासून मृतक महिला ही एकटीच वास्तव्य करीत असून, तिला एक मुलगी व दोन मुले आहेत. तिचा पती बाहेरी राज्यात मुलांसह राहतो. दरम्यान, याच नगरात वास्तव्य करणार्या एक कंत्राटदार शशीकपूर चव्हाण यांच्यासोबत तिचे प्रेम जुळले. याबाबतची माहिती चव्हाण यांच्या कुटुंबियांना झाली. या अनैतिक प्रेमप्रकरणावरून चव्हाण यांच्या कुटुंबियांत वाद व्हायचे. त्यामुळे वडिलाच्या प्रेमकहाणीचा कायम नायनाट करण्याचा बेत त्यांचा मुलगा आरोप अमरजीत चव्हाण यांनी आखला. त्याने चुलत भाऊ सुजीतसोबत वडिलाच्या प्रेयसीवर पाळत ठेवली. बुधवारी ती प्रसाधनगृहास जात असताना तिच्या धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नंदनवार यांनी दिली. याप्रकरणाचा तपास रामनगर पोलिस करीत आहेत.