सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसच्या वतीने गुरूवार, 26 नोव्हेंबर रोजी स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात करण्यात आले. गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून वंदन करण्यात आले.
त्यानंतर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. कामगार विरोधी कायदे मागे घ्या, तीन शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घ्या, स्वामीनाथन समितीच्या सुत्रानुसार किमान आधारभूत किंमत देण्याचे कायदेशीर आश्वासन द्या, कोरोना काळासाठी आयकर कक्षेत न येणार्या सर्व कुटुंबांना 7 हजार 500 रूपये मासिक निर्वाह भत्ता द्या, पुढील सहा महिन्यांसाठी दरडोई 10 किलो मोफत धान्य द्या.
नियमित कामात असणार्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामगार म्हणून मान्यता द्या, समान कामाला समान वेतन द्या, नवीन पेंशन योजना रद्द करा, आशा, अंगणवाडी इत्यादी योजना कर्मचार्यांना नियमित करून त्यांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, पेंशनचा लाभ द्या, कामाचे दोनशे दिवस देण्यासाठी रोजगार हमी योजनेचा विस्तार करा, सरकारी अनुदान देऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करा, असंघटीत कामगारांची नोंदणी करून, त्यांना आरोग्य विमा व 3 हजार रूपये मासिक पेंशन सुरू करा, राष्ट्रीय पथारी विक्रेते धोरणाची अंमलबजावणी करा, आंतरराज्य स्थलांतरीत कामगार कायदा बळकट करून त्याची अंमलबजावणी करा, मेट्रो प्रकल्पात अडथळे बंद करा, महाराष्ट्र राज्य सरकारचा जीएसटीचा वाटा त्वरित द्या आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया, इंटकचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, अॅड्. विजय मोगरे, स्वप्निल तिवारी, दुर्गेश चौबे, जिप सदस्य शिवचंद काळे, नगरसेवक अशोक नागपूरे, देवेंद्र बेले, प्रशांत दानव, तारासिंग कलसी आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, ओबीसी मोर्चा गांधी चौकात येताच नरेश पुगलिया यांनी मोर्चातील ओबीसीबांधवांचे स्वागत केले. मोर्चेकरी बांधवांना पाण्याची बॉटल व बिस्किटचे वाटप करण्यात आले.