खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्रातील आगामी निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. वरच्या राजकीय फळीतील प्रत्येक जण लोकसभा उमेदवार बनण्याकरिता बाशिंग बांधून आहे.त्यातल्या त्यात महाराष्ट्रात चाललेल्या विषम सामाजिक परिस्थितीत जातीय गठ्ठा मतदान आपापल्या पदरात पाडून घेण्याकरिता मीच नेता, मीच समाजाचा कर्ता-धर्ता भासविण्याचा प्रयत्न ठीक ठिकाणी दिसून येत आहे.
देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याच्या निमित्याने भारतीय जनता पार्टीने लोकसभेचे बिगुल वाजविले. त्यात विरोधक कसे मागे पडणार. आता आजी-माजी लोकप्रतिनिधी, राजकीय तथा समाज नेते यांनी निवडणुकीच्या रिंगणात जाण्याचे प्रयत्न चालू केलेले आहे. आणि हमखास यशाची खात्री असलेल्या भारतीय जनता पार्टीकडूनच उमेदवारीची तिकीट मिळावी याकरीता अधिकांश प्रयत्नरत आहेत.
असेच चित्र चंद्रपूर-वणी-आर्णी निर्वाचन क्षेत्रात बघायला मिळत आहे.दिवंगत खासदारांनंतर क्षेत्रात भाजप वरचढ झाली असून कोण कुणाशी अंतर्गत मधुर संबंध ठेवून आहेत, कळायला मार्ग नाही. एकमेकांना साजेसे राजकारण दोन्ही पक्षाचे कद्दावर करत आहेत. त्यांचीच नावे आलटून पालटून चमकताना दिसतात. मात्र सेकंड फळीतील तथा सामान्य पदाधिकारी, कार्यकर्ता उमेदवारीच्या रेस मध्ये कोसो दूर आहे. काम करणारा नविन चेहरा घ्यायला कुणीच तयार नाही पण वरच्या फळीत वेगळीच स्पर्धा सुरु झाली आहे.
परवा निघालेला ओबीसी मोर्चा याच लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे चित्र राजकीय तज्ञांना जाणवले. कारण या अगोदर चंद्रपूर जिल्ह्यात जे कुणबी-मराठा, कुणबी व ओबीसी मोर्चे, उपोषण आंदोलन आदी झाले त्याचे परिणाम त्यानंतरच्या निवडणुकीत दिसून आले होते. माजी खासदार स्व. बाळू धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले हे सर्व याच आंदोलनाचे प्रोडक्ट होते.
समाजातील चळवळी चालविणारे सामाजिक कार्यकर्ते आंदोलन उभे करून सामाजिक प्रश्नांसाठी प्रचंड मेहनत घेत असतात. मात्र त्याचे फळ आंदोलनात चमकोगिरी करणाऱ्या राजकीय मंडळींना मिळत असते.मात्र या अगोदरचे मोर्चे हे दहा हजाराहून अधिकचे झाले होते. परवा झालेला मोर्चा मात्र तीन हजार पार संख्या सुध्दा गाठू शकला नाही. यास कारणीभूत राजकीय लोकांची लुळबुळ तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या मोर्चात पुढे पुढे करून, भोजन दान करून चमकोगिरी करणारी एक लोकप्रतिनिधी ही मोर्चा मीच काढला या तावात होती. या लोकप्रतिनिधीची नय्या वरोरा भद्रावती विधानसभेत डगमगून आहे. मुल-बल्लारशहा विधानसभेत काँग्रेस च्या स्थितीचा त्यांना अभ्यास झाला आहे. त्यामुळे विधानसभेत न पडता आपण लोकसभेचा किल्ला काबीज केला पाहिजे, असा त्यांचा मानस दिसून येत आहे. तिथे आगामी लोकसभेत भारतीय जनता पार्टीकडून भरघोस पार्टी फंड देऊन उमेदवारी घ्यायची व खासदारकीची निवडणूक लढायची असा प्रयत्न या लोकप्रतिनिधी चा सुरू असल्याची आहे.परंतु, इतर पक्षाप्रमाणे भारतीय जनता पार्टी ही तिकीट विकणारी पार्टी नसून ती कसून-चाचपून समीकरण बघून तिकीट वाटत असल्याचे लक्षात आल्याने,त्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून माझ्या पाठीमागे किती लोक आहेत, हे दाखवून देण्यासाठी मोर्चातील सर्व धडपड होती असे दिसून आले.
अप्रत्यक्ष स्वतःची उमेदवारी स्वतःच या लोकप्रतिनिधी ने जाहीर केली आहे. लोकसभा क्षेत्राचा सात बारा आपल्या नावावर केला असे दाखविण्यासाठी हक्काची जागा मी कशी सोडू असे त्या लोकप्रतिनिधीचे बोलणे आहे. मात्र काँग्रेस ची उमेदवारी मिळते की नाही अशी शंका असल्याने, बीजेपीतून उमेदवारी मिळवायची वरच्या पक्ष श्रेष्ठींना आपली ताकत मोर्चातून दाखवायची असा केविलवाणा प्रयत्न त्या लोकप्रतिनिधीचा मोर्चात दिसून येत होता. व पुढे होणाऱ्या ओबीसी - बहुजन मोर्चा मधून होईल हे ठरूनच असल्याचे सामान्य ओबीसी - बहुजनांच्या लक्षात आल्याने त्यानी या मोर्चा कडे पाठ फिरविली असावी कदाचित.
सलग 17वर्ष लोकसभा क्षेत्रात कधीही पराजय न स्वीकारलेल्या भारतीय जनता पार्टीला येथील पराजय जिव्हारी लागला होता. त्यामुळे काँग्रेसचा ओबीसी चेहरा आयात करायचा, त्याला मोर्चाच्या माध्यमातून पुढे करायचे व स्वतःचे नेतृत्व दाखविण्यास सांगायचे, त्यानुसार ही लोकप्रतिनिधी कामी लागली व तिने मोर्चा जणूकाही मीच काढला अशा अविर्भावात नेतृत्व केले. यात सहकार्य करण्यास सोबत काही ओबीसी नेते होते. यात मोर्चा हायजैक करण्याचा प्रयत्न केला.उपवर-वधू परिचय मेळावे, क्रिकेट सामने पैश्याने विकत घेता येतीलही परंतु सामान्य जनतेला तुमची कार्यक्षमता कळली बहुतेक अश्या स्टंट बाजीमुळे ओबीसी समाज दुखावला आहे.म्हणूनच मोर्चातली संख्या घटली.
एवढाच जातीचा कळवला असलेल्या लोकप्रतिनिधिने ओबीसी-बहुजनांसाठी आपण काय योगदान दिले खरे विश्लेषण करणे गरजेचे आहे.खरे पाहता हा मोर्चा या लोकप्रतिनिधिंची अग्निपरीक्षा पाहणारा होता. त्यात ती यशस्वी झाली. पैसे घेवून काहींनी तिला यात मदतच केली,समाजाशी इमान रखनाऱ्या नेत्याच्या प्रतीक्षेत समाजाच्या हाती फक्त निराशा पडतेय.