सध्या चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. या निवडणुका दूर असल्या तरी मतदार संघ बांधण्यासाठी कार्यक्रम सुरू झाले आहेत. भावी लोकप्रतिनिधी आपआपले जनसंपर्क कार्यालय थाटून जनसेवेचा आपल्याला किती पुळका आहे हे दाखवून देण्यात व्यग्र झाल्याचे दिसून येत आहे.
राजुरा विधानसभा मतदार संघ हा कुणबी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मामुलकर ,चटप , निमकर , सुभाष व संजय धोटे हे आमदार या मतदारसंघाने बघितले आहेत. आता या मतदारसंघात नवा भिडू कामाला लागला आहे. चंद्रपूर विधानसभेप्रमाणे इथे देखील पार्सल धाडण्याची तयारी एका प्रमुख राजकीय पक्षाने केली आहे असे भासविण्यात येत आहे. एका अतिशय कार्यक्षम लोकप्रतिनिधीच्या कार्याच्या पुण्याईने बांधलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघात विजय मिळाल्याने अती उत्साहित झालेले पार्सल आता राजुरा विधानसभा काबीज करण्याची स्वप्न बघू लागले आहे. परंतु,जिल्हा परिषद निवडणूक आणि विधानसभा निवडणुक यांची समीकरणे वेगळी असतात हे वेगळे सांगायला नको.
जिल्ह्यातील एका औद्योगिक , कोळसा व्याप्त भागात उदयास आलेले हे पार्सल भक्कम राजकिय आशीर्वादामुळे अनेक महत्वाची राजकीय पदे भूषवते झाले.त्यामुळे आपण फार मोठे नेते झाल्याचा साक्षात्कार झाला. जिल्ह्यात कुठेही गेलो तरी आपण निवडून येऊ शकतो असे त्या पार्सल ला वाटायला लागले व त्या मानसिकतेतुन त्याची पाऊले आता राजुरा विधानसभेकडे वळली.
ज्या औद्योगिक शहरात हे महानुभव तयार झाले तिथे आयोजित कार्यक्रमात कृत्रिम गर्दी जमा करण्याचे लिलया कौशल्य मात्र त्याने आत्मसात केले. त्याच बळावर त्याने दुसऱ्या तालुक्यात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्या ठिकाणी एका अद्वितीय कार्यक्षमता लाभलेल्या नेत्याच्या कर्तृत्वाच्या पुण्याईचे बळ त्याला मिळाले व विजय मिळाला. पण राजकारणात असा अपघात एकदाच होतो वारंवार नाही हे कळायला जी परिपक्वता लागते त्याचा अभाव असल्याने हा "सो कॉल्ड अजातशत्रू" नेता राजुऱ्याकडे निघाला. आपण दिग्विजयी आहोत असा साक्षात्कार झाला असल्यामुळे पुढील प्रवास त्याने सुरू केला. "जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे घेईल जिंकून" या ओळी नुसार त्याने राजुऱ्यात जनसेवेचे दालन उभारले. पण या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी त्याच्या कृत्रिम गर्दीचे कौशल्य कामी आले नाही. रिकाम्या खुर्च्या व उपस्थितांमधील कुजबुज बरेच काही सांगून गेली.
अनेक महत्वाच्या राजकीय पदांवर काम केलेल्या या व्यक्ती बाबत त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना तसूभरही आदर दिसत नाही. कार्यकर्त्यांना एक कट चहा पाजू शकत नाही हा कसला नेता असे प्रश्न याच पक्षातील कार्यकर्ते उपस्थित करतात. आता विधानसभा क्षेत्राबाहेरील लोक गाड्यात भरून, जेवणावळी करून गर्दी जमविणे हा जुनाच फंडा राजुऱ्यात सूरू केल्याने, अहंकार व अटीट्युड ठासून भरलेल्या या व्यक्तीला जमिनीवर आणण्याची किमया राजुऱ्यातील जनता नक्कीच करेल अशीच चर्चा कालपासून विधानसभा क्षेत्रात आढळली.
होय या आधीही पार्सल निवडून देण्याचा प्रयोग चंद्रपूर मध्ये यशस्वी झाला होता कारण त्या ठिकाणी विकासाचे मोठे व्हिजन असलेल्या एका लोकनेत्याचे प्रचंड काम होते,त्यामुळे नागरिकांनी पार्सल निवडून दिले पण राजुऱ्यात तसे आहे काय ? हे त्या पार्सल नेत्याला समजू नये, हा फक्त राजकीय मुत्सद्देगिरीचा अभाव आहे. तूर्तास एवढेच.
🪀 खबरकट्टा EXCLUSIVE : राजुरा विधानसभेत राजकारण मामाचे!
✌🏻 मामा... मामा... फक्त मामा...!
1️⃣ #फिक्स आमदार : भोंगळे यांचा विजय निश्चित?
2️⃣ चटप परिवाराचे मूसद्दी राजकारण!
3️⃣ काँग्रेस च्या धोटे गटात एकीचे बळ!
4️⃣ गोंडवाना ठरणार निर्णायक!
5️⃣ घुग्गुस ची पार्सल डिलिव्हरी राजुऱ्यात...!
www.khabarkatta.com