केंद्रीय वन सल्लागार समितीने जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मुर्ती गाव, विहिरगाव येथील प्रस्तावित 'ग्रीनफिल्ड' विमानतळाचा प्रस्ताव नाकारला आहे. सदर विमानतळाची प्रस्तावित जागा वन्यजीवांच्या अधिवासासाठी महत्त्वाची असल्याचे सांगत विमानतळाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
वन सल्लागार समिती ही केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाची वैधानिक संस्था आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी समितीची 7 जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत समितीने विमानतळाचा हा प्रस्ताव फेटाळला. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी समितीसमोर प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु समितीने त्यांची बाजू मान्य केली नाही. विमानतळासाठी प्रस्तावित केलेली जागा ही वन्यप्राण्यांचे महत्त्वाचे अधिवास असून येथे विमानतळ उभारल्यास मानवी हस्तक्षेप वाढेल, असा युक्तिवाद समितीने केला.
विशेष म्हणजे राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. प्रदीर्घ प्रयत्नांनंतर त्यांनी विमानतळासाठी राजुरा तालुक्यातील विहीरगाव-मूर्तीजवळील जमीन ओळखली होती. या प्रस्तावित विमानतळासाठी 63 हजार हेक्टरहून अधिक वनजमीन वळवावी लागणार आहे. मात्र, ज्या भागात हे विमानतळ प्रस्तावित आहे, त्या भागात वाघ आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर आहे. तसेच जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेले कान्हळगाव अभयारण्य हे विमानतळाच्या प्रस्तावित जागेपासून जवळ आहे. विमानतळामुळे परिसरातील वाघांच्या नैसर्गिक कॉरिडॉरला धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण देत समितीने अहवाल फेटाळला.