खबरकट्टा/चंद्रपूर :
कचरा संकलन व वाहतुकीच्या कंत्राटाची दुसरी निविदा काढून प्रत्येक टनामागे अकराशे रुपयांची वाढ केल्याने मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला होता.
दरम्यान मनपाने कंत्राटदराला दर कमी करण्यास सांगितले. मात्र कंत्राटदाराने न्यायालयाचे दार ठोठावले. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मनपाच्या बाजूने निकाल देत हे कंत्राट रद्द केले. या निकालामुळे मनपाचे कोट्यावधी रुपयांची बचत झाली. तसेच भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला यश आल्याने जनविकास सेनेतर्फे पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात मनपासमोर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान मिठाई वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.#khabarkatta chandrapur
यावेळी जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे,मनिषा बोबडे,अक्षय येरगुडे, इमदाद शेख, प्रफुल बैरम, गितेश शेंडे,निलेश पाझारे, अमोल घोडमारे, रवी काळे ,कविता अवथनकर, मेघा मगरे, माया बोढे, स्नेहल चौथले, बबिता लोडेल्लीवार भाग्यश्री मुधोळकर, रमा देशमुख आदी उपस्थित होते.#khabarkatta chandrapur
कचरा संकलन व वाहतुकीचे सुमारे 100 कोटी रुपयांचे सात वर्षाचे कंत्राट 1700 रुपये प्रति टन दराने स्वयंभू एजन्सीला देण्यात आले होते. यात 3 वर्षे मुदतवाढीची तरतूद कंत्राटामध्ये होती. मात्र पहिली निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवून 2800 रुपये प्रति टन दराने स्वयंभू एजन्सीला हे काम देण्यात आले. प्रत्येक टनामागे 1100 रुपये वाढल्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन शहर विकास आघाडीचे गटनेते जनविकास सेनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला होता. अनेक राजकीय पक्ष व संघटनांनीही या घोटाळ्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने कंत्राटदाराला वाटाघाटीसाठी बोलावून दर कमी करायला सांगितले. मात्र कंत्राटदाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. दरम्यान न्यायालयाने कंत्राटदाराच्या बाजूने आदेश दिला होता. यानंतर मनपाने सर्वोच्च न्यायालयात अपील केली. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मनपाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे हे कंत्राट रद्द होणार असून या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.#khabarkatta chandrapur
देशमुखांना स्थायी व सर्वसाधारण सभेत उचलला होता आवाज माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी अनेक सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभेमध्ये या घोटाळ्याविरोधात आवाज उचलला होता. दहा वर्षांमध्ये मनपाचे सुमारे 40 कोटींचे नुकसान होईल असा दावा देशमुख यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे चंद्रपूरकरांच्या घामाच्या पैशाची बचत झाली आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्याकरिता शुक्रवारी जनविकास सेनेतर्फे मनपासमोर फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटप करून आनंद साजरा केला.
कचरा घोटाळ्याचा गौप्यस्फोट करणार- देशमुख
पुढील दोन-तीन दिवसात कचरा घोटाळ्याप्रकरणात गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. ते कोणता गौप्यस्फोट करतात याकडे चंद्रपुरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

