खबरकट्टा/चंद्रपूर:
राज्य व्यापण्यासाठी मान्सूनने प्रतिक्षा करायला लावली असली तरीही तापमानात मात्र सातत्याने चढउतार होत आहे. राज्यातील बहुतांश भागात उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस प्रामुख्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. खात्याने उष्णतेचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
जून महिन्याचा पूर्वार्ध संपला तरीही अजूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय झालेला नाही. त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी अधिक आहे. विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.#khabarkatta chandrapur
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होऊन वातावरणात गारवा निर्माण होतो आणि तापमान कमी होत असते. मात्र, यंदा दमदार पाऊस न झाल्याने तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस विदर्भात उष्णता जास्त जाणवणार आहे. या परिस्थितीत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.#khabarkatta chandrapur
‘बिपरजॅाय’ चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सून लांबल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहे. 23 जूननंतर मान्सून संपूर्ण राज्यात सक्रीय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानेदेखील जोपर्यंत 50 ते 60 टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे.#khabarkatta chandrapur
