अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करा: अन्यथा आंदोलन छेडणार
खबरकट्टा /चंद्रपूर :
दोन वर्षाआधी रस्ता दुरुस्तीच्या नावाने संपूर्ण चंद्रपूर ते जुनोना रस्ता खोदण्यात आला आहे. दोन वर्षानंतर ही जुनोना ते चंद्रपूर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.अनेक ठिकाणी केवळ गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन चालविणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याने साधे पायी चालनेही शक्य नाही.रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे व जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
रात्रीचे वेळी या रस्त्यावर येणारी नवीन वाहने काही ठिकाणी रस्ता चांगला असल्याने वाहन जोरात हाणतात. परंतु त्यांना माहीत नसते की, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे ,गिट्टी जमा झाली आहे.तेव्हा त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे. समोरून मोठी वाहन आल्यानंतर सर्वत्र धूळ पसरतो त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने दुचाकी वाहन चालकांना गिट्टीतून वाहन घालवावी लागते. रुग्ण व गर्भावती स्त्रियांना दवाखान्यात घेऊन जाण्यास खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे गावातील नागरिकही आता रस्ता दुरुस्तीसाठी आक्रमक झाले आहेत.
दोन वर्षानंतर ही जुनोना ते चंद्रपूर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. वेळावेळी या रस्त्यासाठी संबंधित गुत्तेदारांना निवेदन देऊन काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप या मागणीची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. अर्धवट रस्त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडले आहे. आता आमच्या सहनशिलतेची मर्यादा संपली आहे. येत्या पाच दिवसांत काम सुरु न झाल्यास आमच्या रोषाला संबंधितांना सामोरे जावे लागले. जुनोना ते चंद्रपूर अर्धवट रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही गावकर्यांनी प्रशासनाला दिला आहे.