कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडीसिवीरच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या अखंडित उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. ‘म्युकरमायकोसीस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात राज्यातील कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (व्हीसीद्वारे), मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलावीत. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी. तिसरी लाट येण्यापूर्वी ही व्यवस्था यथाशिघ्र उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यासाठी २५ हजार मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावर निविदा काढण्यात येत आहे.
ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या ‘पीएसए’ प्लॅन्टची निर्मिती प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे. राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये ३०१ प्लॅन्ट उभारण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी ३८ प्लॅन्ट कार्यरत आहेत. या ३८ प्लॅन्टमधून ५१ मेट्रीक टन ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात व जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘पीएसए’ प्लॅन्ट उभारण्यात येत आहेत. २४० प्लॅन्ट उभारण्यासाठीची वर्क ऑर्डर देण्यात आली असून त्याची प्रक्रीया सुरु आहे. येत्या काही काळात सर्व प्लॅन्टचद्वारे राज्यात एकूण सुमारे ४०० मेट्रीक टन प्रतिदिन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या ऑक्सिजनद्वारे १९ हजारपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडची गरज पूर्ण होईल.
उपलब्ध मेडिकल ऑक्सिजनचे राज्यात कार्यक्षमपणे वितरण होण्यासाठी कोविड रुग्णांची जिल्हानिहाय संख्या लक्षात घेऊन वितरण करण्यात यावे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दोन विभागांसाठी सचिव दर्जाचे अधिकारी त्यावर लक्ष ठेऊन त्याचे नियंत्रण करत आहेत. त्यांनी राज्यात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्लॅन्टच्या उभारणीच्या कामात समन्वय ठेवत काम वेगाने करुन घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीचे व्यवस्थापन आणि लेखापरिक्षण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यातील प्लॅन्टच्या व रुग्णालयाच्यास्तरावर टेक्नीकल ऑडिट व मेडिकल ऑडिट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावे. ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन नर्सची नियुक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
कोराना उपचारादरम्यान देण्यात येणा-या स्टेरॉईडमुळे रूग्णांना अतिशय गंभीर साईड इफेक्टचा सामना करावा लागत आहे. म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रूग्णांवर होत आहेत. राज्यभरात अशा रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. अशा वेळी रूग्णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहे. यासंदर्भातील प्रतिबंधात्मक इंजेक्शन्स महागडे आहे, शस्त्रक्रियेचा खर्च देखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरचा आहे. त्यामुळे या बुरशीजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्या, विशेषतः अॅम्फोटरसीन –बी हे इंजेक्शन प्रतिबंधक इंजेक्शन कमी किंमतीत उपलब्ध करावे तसेच गोरगरीब रूग्णांच्या सोयीच्या द़ष्टीने या उपचाराचा समावेश महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत करण्याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाला केली होती.
प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे ब-या झालेल्या कोविड रूग्णांमध्ये हा दुर्मिळ संसर्ग आढळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य आजाराचे रूग्ण वाढले आहेत. याचा म़त्युदर हा 54 टक्के असुन वेळेवर उपचार घेतल्यास आजारातुन बाहेर पडता येते. नाकावाटे ही बुरशी डोळे आणि मेंदुकडे वाढत जाते. लवकरात लवकर निदान झाल्यास इंजेक्शनच्या माध्यमातुन उपचार करता येतात. कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणा-या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जिवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर म्युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची वाढत होत आहे.
या बुरशीच्या संसर्गाचा वेग सर्वाधीक असुन उपचारासाठी वेळ कमी मिळतो. लवकर निदान झाले तर इंजेक्शन द्वारे उपचार शक्य होतो. जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. डोळयांपाशी संसर्ग पोहचल्यास त्यांना कायम स्वरूपी इजा होण्याची शक्यता असते. अनेक रूग्णांचे डोळे यामुळे काढले गेले आहे. हा संसर्ग मेंदु पर्यंत पोहचल्यास उपचार करणे दुरापास्त होते व रूग्णांचा मृत्यु होतो.
यासाठी अॅम्फोटरसीन –बी हे इंजेक्शन प्रतिबंधक इंजेक्शन आहे. याची किंमत 40 ते 45 हजार इतकी आहे. ती सर्वसामान्य गरीब रूग्णाला परवडणारी नाही व एकुणच भारतात हे इंजेक्शन्सचा साठा संपल्याची माहिती आहे. त्यामुळे या इंजेक्शन्सचे उत्पादन मोठया प्रमाणावर करून कमी किंमतीत हे इंजेक्शन उपलब्ध होणे आवश्यक आहे. कारण या पुढच्या टप्प्यात जर शस्त्रक्रिया करावी लागली तर त्याचा खर्च किमान दिड ते दोन लाख असल्यामुळे सर्वसामान्य गरीब रूग्णाला ते परवडणारे नाही.
या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रामुख्याने कोरोना रूग्णांवर उपचार करतांना अत्यल्प प्रमाणात स्टेरॉईडचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अॅन्टी फंगल औषधे रूग्णांना देण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने हाय रिस्क असलेल्या रूग्णांमध्ये हा संसर्ग आल्यास धोका जास्त आहे. त्यातही ऑक्सीजन पाईपलाईन, सिलेंडर यात हा जंतु गेल्यास त्याचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सुध्दा उपाययोजना करणे आवश्यक आहे. विशेषतः गोरगरीब नागरिकांच्या सोयीच्या द़ष्टीने यासंदर्भातील उपचाराचा खर्च महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ करणे गरजेचे होते. त्यामाध्यमातुन मोठया प्रमाणावर गरीब रूग्णांना मोठया प्रमाणावर लाभ मिळेल.
कोरोनाचे संकट मोठे आहे मात्र त्यानंतर सुध्दा या बुरशीजन्य आजाराच्या माध्यमातुन रूग्णांच्या जिवाला धोका आहेच. त्यादृष्टीने प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलत वरील प्रमाणे उपाययोजना करण्याची आवश्यकता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केले होते.

