खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा:
खरीप हंगामाला सुरुवात होऊ घातली असून खते, बी-बियाणे व इतर आवश्यक कृषी निविष्ठा विकत घेण्यासाठी सर्वत्र शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे. वाढलेला कोरोना संक्रमणाचा धोका, सततचे लॉकडाउन, खताच्या पुरवठा आणि दराबद्दल असलेला संभ्रम यामुळे शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांसमोर पुढील काही महत्वाची आव्हाने आहे.
1. शहरात कोविड संक्रमनाचा धोका प्रचंड असल्याने कृषी सेवा केंद्रात गर्दी करणे धोक्याचे झाले आहे.
2. सद्या काही प्रमाणात बाजारात बोगस कृषी निविष्ठा पसरलेली असून त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
3. लॉकडाउन आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढलेला आहे, यांचा शेतकऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडतो आहे.
4. लॉकडाउन, साठेबाजीमुळे शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्ठा उपलब्ध न होण्याचा धोका आहे.
5. कृषी निविष्ठाच्या अव्वाच्या सव्वा दरामुळे शेतकऱ्यांची लूट होते आहे.
या सर्व समस्यांना लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवत ‘कृषी-स्वराज’ उपक्रमाद्वारे राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा बाजारभावापेक्षा हमखास कमी दरात शेतकऱ्यांच्या गरजेनुसार वेळेत घरपोच उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम सतीश गिरसावळे, अमेय धोटे आणि संयोग धोटे या तीन इंजिनिअर मित्रांनी हाती घेतला आहे.
या ‘कृषी-स्वराज’ उपक्रमाअंतर्गत कृषी निविष्ठाचे ऑर्डर्स फोनद्वारे स्वीकारले जातात, त्यानंतर ‘कृषी स्वराज’ टीमद्वारे गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठाची खात्री करून बाजारभावापेक्षा कमी दरात घरपोच उपलब्ध करून दिले जात आहे. खात्रीलायक खते व बियाणे बाजारापेक्षा कमी दराने घरपोच उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या वेळीची आणि पैशांची मोठी बचत होते असल्याने या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
रासायनिक खतांचा मर्यादित पुरवठा घरपोच करण्यासोबतच मातीचे आरोग्य सुधारावे आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी ‘ना नफा’ तत्वावर सेंद्रिय खते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून दिले जात आहे. याच उपक्रमाद्वारे सुमारे २५ टन सेंद्रिय खत पंचाळा गावातील शेतकऱ्यांना ३० मे ला उपलब्ध करून दिले गेले असून या सेंद्रिय खताच्या प्रत्येक गोणीमागे शेतकऱ्यांचे ५५-६० रुपयाची थेट बचत झाली आहे. राजुरा तालुक्यात आगामी काळात १२५ ते १५० टन सेंद्रिय खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे ‘कृषी-स्वराज’ टीमचे लक्ष्य आहे.
या सेंद्रिय खताच्या वितरणाच्या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री. विठ्ठल मकपल्ले यांनी उपस्थिती नोंदवून सेंद्रिय खतांचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले आणि कृषीस्वराज टीमच्या कामाला शुभेच्छा दिल्या. यादरम्यान तालुका कृषी अधिकारी श्री. विठ्ठल मकपल्ले यांच्यासोबतच कृषी मंडळ अधिकारी श्री. चेतन चव्हाण, कृषी सहाय्यक श्री. प्रदीप कळभाने आणि पंचाळा गावातील शेतकरी उपस्थित होते.


