गोंडपिपरी तालुक्यातील अंधारी नदीवर एका मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.नदीकाठावर कामाच्या ठेकेदाराने आपला डेरा मांडला आहे.अशावेळी तीन ते चार मशनरीचा वापर करून रेतीचा दिवसाढवळ्या उपसा केला जात आहे.दरम्यान मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा पुलाच्या बांधकामावर आढळून आल्यामुळे ठेकेदार गोत्यात अटकण्याची चिन्हे दिसू लागली असताना दुसरीकडे सदर प्रकारानंतर आता जनतेत संताप वाढू लागला आहे.
तारडा येथील चक्क नदीपात्रालाच उपसून काढण्याचा प्रकार प्रसारमाध्यमाने उघडकीस आणला.सदर प्रकारातून दिवसाढवळ्याच रेती चोरी सुरू आहे.दरम्यान अंधारी नदी काठावरील पुलाच्या बांधकाम साइटवर आतापर्यंत शेकडो ब्रास रेती टाकल्या गेली आहे.अजूनही नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रीतीचे ढिगारे उभे आहेत.
अर्धे पात्रच चोरट्यांनी खोदून काढले.अशा परिस्थितीत या गंभीर प्रकाराची दखल प्रसिद्धीमाध्यमाने घेतली.यासंदर्भात अनेक बातम्या प्रसारित झाल्या.सदर बातम्याच्या माध्यमातून तारडा येथील बोगस प्रकार उजेडात आणला.त्याचवेळी प्रशासनाची कानउघडणी देखील करण्यात आली.
मात्र गोंडपिपरी येथील मुजोर अधिकाऱ्यांना याचे काही गांभीर्य कळले की नाही,अजूनपर्यंत सबंधित विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने नदीघाटावर भेट देऊन तेथील गैरप्रकाराची चौकशी करण्याचे सौजन्य दाखविले नाही.पुलाच्या बांधकामासाठी चक्क अंधारी नदीवरच डल्ला मारल्याचा प्रकार चर्चेत असताना अजूनही मोठ्या प्रमाणात उत्खनन करून रेतीचे ढिगारे नदीपात्रात उभे आहेत.
पात्रातील हा साठा वाहतुकीसाठी ठेवला असून कुठल्याहीक्षणी या मालाचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता अधिक आहे.अशावेळी प्रसारमाध्यमातून प्रशासनाला दक्ष करण्यात येऊनही येथील महसूल आणि पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकारावर कुठलीच कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्यावर चोरट्यांना रान मोकळे करून दिल्याचा आरोप होत आहे.
दिवसाढवळ्या होणाऱ्या उत्खननाबाबत अनेकांकडून संबंधितांची विचारणा होत आहे.त्यावेळी ते न्यायालयाचा निर्णय आहे हेच सांगतात मात्र अजूनपर्यंत एकाही व्यक्तीपुढे त्यांनी सबंधित निर्णयाची प्रत ठेवली नाही.तसा निर्णय असेलही त्यावेळेस सदर निर्णयाची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेमार्फतच होत असताना याची कल्पना अधिकाऱ्यांना का नाही,असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


