खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात कापूस विक्रीकरिता यावर्षी CCI केंद्र नसल्यामुळे कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता CCI केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरपना तालुका हा यवतमाळ व चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वाधिक कापूस उत्पादक भाग आहे.मागील वर्षी कोरपना तालुक्यात कापूस विक्रीसाठी CCI केंद्र सुरू होते परंतु या वर्षी CCI च्या कापूस खरेदीच्या यादीतून कोरपना तालुक्याला वगळण्यात आले आहे.तसेच कोरपना येथून 50 किमी दूर राजुरा येथे कापसू विक्रीसाठी CCI चे केंद्र देण्यात आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास होणार आहे,तसेच कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना राजुरा येथे कापूस विक्रीसाठी नेणे अतिशय लांब टप्पा पडणार आहे.
राजुरा येथे कापूस विक्रीसाठी गोंडपीपरी,बल्लारपूर, राजुरा,जिवती,कोरपना तालुक्यातील हजारो शेतकरी जाणार असून त्यामुळेप्रचंड प्रमाणात गर्दी होऊन यंत्रणेवर कापूस खरेदीसाठी प्रचंड ताण येणार आहे.
त्यामुळे शासनाने सदर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्री सोयीचे व सुलभ होण्याकरिता कोरपना तालुक्यात CCI केंद्र सुरू करावे अशी मागणी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.