खबरकट्टा / यवतमाळ : वणी - सुरज चाटे
भाजपच्या मोदी केंद्र सरकारने संसदेत चर्चा न करता शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या घशात घालणारा कृषी कायदा करून ही सरकार भांडवलदार धार्जिनी असल्याचे व शेतकरी विरोधी असल्याचे जाहीर केले असून हा कृषी कायदा ताबडतोब परत घ्यावा ह्या प्रमुख मागणी सोबत शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांना घेऊन वणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर निदर्शने आंदोलन महाराष्ट्र राज्य किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आले.
केंद्र सरकारने कृषी संबंधी तीन विधेयके संसदेत बहुमताचे जोरावर कुठलीही चर्चा न करता पास करून देशातील शेतकऱ्यांना भांडवली कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे व ह्या कायद्याने शेतकऱ्यांचे हित न होता भांडवली कंपन्यांच्या तिजोर्या भरल्या जाणार असल्याने तीन कोटी सभासद असलेल्या अखिल भारतीय किसान सभा या कायद्याचे तीव्र निषेध करीत आहे.
या तीन कृषी कायद्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मोडकळीस येणार असून शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणारा हमी भाव संपुष्टात येणार आहे. सर्व धान्य, डाळी, तेलबिया, कांदा, बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढल्या जात आहे. या सरकारने मोठ्या कृषी उद्योगांना खुष करण्यासाठी केवळ विरोधकांनाच नाही तर त्यांच्या मित्र पक्षाशीही चर्चा न करता हा कायदा मंजूर करून घेतला आहे.
या सरकारच्या काळात शेतकरी अधिक कर्जबाजारी झाला आहे, दर तासाला दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ह्या कायद्याने शेती व्यवस्था मोडकळीस येऊन शेतकरी भांडवलंदारांचे गुलाम बनतील, करिता देशभरात किसान सभा आंदोलन करीत आहे.
वणी येथे झालेल्या ह्या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके यांनी केले असून आंदोलनात प्रामुख्याने मनोज काळे, खुशाल सोयाम, रामभाऊ जिद्देवार, किसन मोहूर्ले, कवडू चांदेकर, गजानन ताकसंडे, सुधाकर सोनटक्के, ऍड विप्लव तेलतुंबडे, सुरेश शेंडे, शिवशंकर बंदूरकर, नंदू बोबडे, विवेक चरडे, किशोर आत्राम, संजय कोडापे, भास्कर भगत, दिगंबर सहारे, अरुण साळवे, व्ही आर कोळसेपाटील, आनंदराव पानघाटे आदी हजर होते.