चंद्रपूर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रूग्णसंख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. अशातच योग्य उपचाराअभावी कोरानाग्रस्तांचे मृत्यु होत असल्याने आरोग्य व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनातर्फे केवळ घोषणा करण्यात येत आहेत, प्रत्यक्षात घोषणांची अंमलबजावणी मात्र होत नाही.
घोषणांचा सुकाळ मात्र अंमलबजावणीबाबत दुष्काळ अशी स्थिती या जिल्हयात निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्वसामान्य नागरिक यात भरडले जात आहे. तीन दिवसाआधी आम्ही जिल्हाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून चंद्रपूरात खनिज विकास निधीतुन कोविड रूग्णांच्या निःशुल्क उपचारासाठी एक हजार बेडचे जंबो हॉस्पीटल उभारावे या मागणीचे निवेदन सादर केले होते.
48 तासाच्या आत याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी सुध्दा आम्ही केली होती. मात्र जिल्हा प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास हे आंदोलन अधिक तिव्र करण्याचा ईशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिला आहे.
दिनांक 26 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपातर्फे चंद्रपूरात खनिज विकास निधीतुन कोविड रूग्णांच्या निःशुल्क उपचारासाठी एक हजार बेडचे जंबो हॉस्पीटल उभारावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपा नेते राजेंद्र गांधी, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, राजेंद्र अडपेवार, प्रकाश धारणे, प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना देवराव भोंगळे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी चारशे बेडचे कोविड रूग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत विरली.
पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिका-यांनी केलेल्या घोषणांबाबत काय झाले याबाबत लेखी माहिती मिळावी म्हणून आम्ही विचारणा केली असता त्याची उत्तरे दिली जात नाहीत, घोषणांची अंमलबजावणी होत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. खनिज विकास निधी, जिल्हा वार्षीक योजना, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातुन मोठया रकमा उपलब्ध करून दिल्याचे सांगीतले जाते. ऑक्सीजन लिक्वीड प्लॅन्ट उभारणीबाबत घोषणा केल्या जातात.
मात्र प्रत्यक्षात या घोषणांबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाहीत. रूग्णांसाठी रूग्णवाहीका उपलब्ध होत नाहीत, आवश्यक औषधे, इंजेक्शन्स उपलब्ध होत नाहीत. मात्र यासाठी निधी उपलब्ध केल्याचे सांगीतले जाते. केवळ घोषणाच या जिल्हयातील नागरिकांच्या वाटयाला येत आहेत. मात्र प्रत्यक्ष कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजनांचा अभाव आहे.
हा जिल्हा देशातील सर्वाधिक प्रदूषीत जिल्हा म्हणून ओळखला जातो. वेकोलिच्या कोळसा खाणी, विविध उद्योगांच्या माध्यमातुन होणा-या प्रदूषणामुळे जिल्हयातील नागरिकांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी खनिज विकास निधी हे माध्यम उपलब्ध असताना यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खनिज विकास निधीतुन एक हजार बेडचे जंबो कोविड रूग्णालय उभारावे व कोविड रूग्णांना त्या माध्यमातुन निःशुल्क उपचार देण्याची मागणी देवराव भोंगळे यांनी यावेळी बोलताना केली.