- मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शिर्डीकरांचे आंदोलन मागे
- पाथरीचा विकास तीर्थक्षेत्र म्हणून होणार
- मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला शिर्डी व पाथरीकरांचीही संमती
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद अखेर निवळला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केली होती. त्यामुळे शिर्डीसह २५ गावांतील ग्रामस्थ दुखावले गेले होते. पाथरी नव्हे तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. याप्रश्नी चर्चेअंती तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचवेळी बंद मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली होती.
या विनंतीला मान देत शिर्डीकरांनी रविवारी रात्री बंद मागे घेतला होता. दरम्यान, या प्रश्नावर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीने बैठक घेतली व वादावर तोडगा काढला. शिर्डी व पाथरीकरांनी या बैठकीत सामोपचाराची भूमिका घेतली. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असेल तर त्यास आमची कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्र्यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख मागे घेतला. 'पाथरी तीर्थक्षेत्र विकास' हे नाव योजनेसाठी निश्चित झाले झाल्याने वाद निवळला आहे.