खबरकट्टा / नागपूर :
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी कोणतीही स्थगिती कुठल्याही कामांना दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त 14 गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येईल. तसेच चंद्रपूरसह, गडचिरोली, गोंदिया नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये ओलीतासाठी कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
नागपूर अधिवेशनादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थित अधिकाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात काल दिनांक 17/12/2019 आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला गृहमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार, कीर्तीकुमार भांगडीया, प्रतिभा धानोरकर, मुख्य सचिव अजोय मेहता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहेल, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.